Marathi e-Batmya

एकनाथ खडसे म्हणाले, पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना सुबुध्दी दे…

राज्यातील सत्तासंघर्षाला दोन महिने झाले तरी अद्याप त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप निकाल आला नाही. तसेच न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवावा लागला. त्यातच आता सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत म्हणाले, मी गणरायाला साकडं घातलंय की गणराया पालकमंत्री नेमण्याची सुबुध्दी मुख्यमंत्र्यांना द्यावी.

गणपती बुद्धीची देवता आहे. विघ्नहर्ता आहे. मी गणपतीला विनंती करतो की, पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बुद्धी द्यावी. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याची वेदना आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री नेमून गावागावांपर्यंत बैठका घेऊन सरकार सक्रिय व्हावे, असे साकडे एकनाथ खडसे यांनी गणपतीला घातले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची भीती असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार व पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबवल्या असाव्यात, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.

जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला, याचे श्रेय आपले असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. अनेक आमदार-खासदारांना जिल्ह्यात निवडून आणले. जसं एखाद्या पार्टीचे यश असते तसेच ते नेतृत्वातही यश असते, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून नाथाभाऊ विरोधकांना उरून पुरला म्हणत. ज्यावेळी भाजपात होतो, त्यावेळी नागरिकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला व अनेक आमदार-खासदार जिल्ह्यातून निवडून आले, असे त्यांनी म्हटले. विरोधकांना आपल्याला ना उमेद केल्याशिवाय यश मिळणार नाही, त्यामुळे सर्वच विरोधक एकवटले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Exit mobile version