Marathi e-Batmya

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यातील  अतिवृष्टीचे संकट आणि  पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता   बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा  अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.

फेब्रुवारी -मार्च महिन्यात होऊ घातलेल्या  बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आज, मंगळवारी  संपत होती. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्याच्या अन्य भागात  होत असलेल्या  अतिवृष्टिमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क साधून  अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात शालेय  शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर  नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

Exit mobile version