Marathi e-Batmya

केंब्रीज, ऑक्सफर्डपेक्षा जास्त शहाणे आहेत का माहिती नाही पण, राज्यापालांकडे खरे ज्ञान

मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचे समर्थन करतांना ऑक्सफर्ड, केंब्रीज आणि आय.आय.टी. दिल्ली चा दाखला दिला. ही विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेत नाहीत, अशी असत्य माहिती पवार साहेबांसारख्या नेत्याने दिली, हे दुर्दैवी आहे.
ऑक्सफर्ड आणि केंब्रीज विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेणार आहेत. अशा प्रकारे ऑनलाइन परीक्षाची सूचना महाराष्ट्रातील सर्व कुलगुरूंच्या बैठकीत सुद्धा करण्यात आली होती. आय.आय.टी. दिल्ली सुद्धा लेखी परीक्षा न घेता ऑनलाइन परीक्षाच घेणार आहेत. जगातील मान्यताप्राप्त विद्यापीठ व आय.आय.टी. आपल्या विध्यार्थ्याचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करीत असतात. अंतर्गत मुल्यमापनामध्ये प्रश्न मंजुषा, मिड सेमिस्टर परीक्षा, असाईनमेंट, वैगेरे गोष्टी वर्षभर सुरु असतात. त्यामुळे तेथे अंतर्गत व सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या आधारे सरासरी काढणे शक्य आहे व ते गुणवत्तेला धरून सुद्धा आहे. तरी सुद्धा या सगळ्या अग्रगण्य संस्था ऑनलाइन परीक्षा घेऊनच विद्यार्थ्याच पदवी वर्षाचं मूल्यमापन करीत आहे. आपल्या विद्यापिठातील पारंपारिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत असे अंतर्गत मूल्यमापन होत नसतं. अंतिम परीक्षेलाच १०० गुण असतात. त्यामुळे परिक्षा न घेणं हे गुणवत्तेला धरून मानला जाणार नाही. ऑक्सफर्ड, केंब्रीज, नानयांग विद्यापीठ सिंगापूर, जर्मनी व अमेरिकेतील विद्यापीठ या सर्व ठिकाणी अंतिम वर्षाच्या परिक्षा विविध पद्धतीने घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू समितीच्या या अहवालात बहुपर्यायी प्रश्न (एम.सी.क्यू.) ओ.एम.आर. आधारित परिक्षा, खुले पुस्तक परिक्षा, खुले पर्याय परिक्षा, असाईनमेंट असे विविध पर्याय सुचविले होते. याबाबत राज्य सरकारने काय विचार केला हे अध्याप विध्यार्थी वर्गाला समजले नाही. परिक्षा न घेता गेल्या दोन वर्षाच्या आधारे सर्वसाधारण सरासरी गुण देणं म्हणजे सुमारे ४५ टक्के (९ लाखां पैकी ४ लाख) विद्यार्थ्यांना पदवी परिक्षेत नापास करणेच आहे. ४ लाख विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारात घालण्याचा अधिकार राज्य सरकारला कोणी दिला ? असा प्रश्न विनोद तावडे यांनी उपस्थित केला.
त्यामुळे राज्यपाल यांनी घेतलेली भूमिका हि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारेच असून विद्यार्थ्यांना सरसकट नापास करणं हे सुद्धा रोखणार आहे. त्यामुळे राज्यपाल केंब्रीज पेक्षा शहाणे आहेत कि नाही माहित नाही पण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रीजचे सत्य जाणणारे नक्कीच असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version