Marathi e-Batmya

११ वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर : या पाच शहरांमध्ये होणार केंद्रीय पध्दतीने

मुंबई: प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाने ११ वी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केल्यानंतर आता शिक्षण विभागाने ११ वी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ केला असून त्यासाठीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. हि प्रक्रिया उद्या शनिवारी १४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार असून 11thadmission.org.in  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. तसेच पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यामुळे आता ११ वी प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार याबाबतची उत्त्सुकता आता संपली.

ऑनलाईन अर्ज भरणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, पसंतीक्रमांक देणे, प्रवेश फेरीमध्ये मिळालेल्या विद्यालयात प्रवेश निश्चित करणे याबाबत (पहिल्या फेरीसाठी) तपशील वेळापत्रकामध्ये देण्यात आलेला आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही वेळेत केली जाईल. यापूढील प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. उद्यापासून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग १ भरायचा आहे. तर १७ ते २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग २ भरावा लागणार आहे. २५ ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर जे पसंती क्रमांक मिळाले आहेत. त्यानुसार २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज मिळालं हे कळेल.

त्यानंतर २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना आपले कॉलेज निश्चित करायचे आहेत. विद्यार्थ्यांना कॉलेज पसंत नसेल तर ३० ऑगस्टला संध्याकाळी १० वाजता रीक्त जागांबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या गुणवत्ता यादीबाबत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. काही दिवसांनतर दुसरी गुणवत्ता यादी आणि त्यापुढचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Exit mobile version