Marathi e-Batmya

अजित पवार यांची खोचक टीका, मुख्यमंत्री काय बोलतात त्यांच त्यांनाच कळत की नाही…

मागील काही दिवसांपासून पत्रकार परिषदांमध्ये किंवा एखाद्या भाषणा दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत असताना त्यांना मध्येच कोणी तरी चिठ्ठी पाठवून देत मुद्दा सुचवितात. तर काही वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून मुख्यमंत्री शिंदे तेच वाचतात किंवा त्यांनी इशारा की संबधित विषयावरून बोलण्याचे थांबवतात. यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कृत्यावरून चांगलच टिकास्त्र सोडलं. नुकतेच साताऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना खोचक शब्दांत टोलेबाजी केली.

अजित पवारांनी यावेळी बोलताना शेतकरी मदतीवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडताना म्हणाले, अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी पूर आले नद्यांना. गारपीट झाली. फळबागांचं, बारमाही पिकांचं नुकसान झालं. म्हणे आम्ही मदत करणार. आरे कधी करणार? त्या शेतकऱ्याचा अंत किती बघताय? त्याची सहनशीलता संपली ना. कधी करणार तुम्ही मदत? त्यासाठी तिथे बसून काम करून घ्यावं लागतं. लोकांना अजिबात मदत होत नाहीये. सरकार ढिम्म आहे. आमदार निधी वाटपालाही स्थगिती दिली. काय कारण आहे? मी आमदार निधी १ कोटीवरून ५ कोटीपर्यंत वाढवला. आम्ही सगळ्या आमदारांना निधी दिला, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

राज्य सरकारकडून जाहिरातबाजीवर करण्यात येणाऱ्या खर्चावर अजित पवारांनी यावेळी बोट ठेवलं. तुमच्या पैशांमधून सरकारची जाहिरातबाजी चालू आहे. पहिल्या पानावर जाहिराती झळकतात. मुंबईला तुम्ही आलात तर बेस्ट बसेसवर यांचेच फोटो असतात. एखाद्याची बघायची इच्छा नसली तरी बघायलाच लागेल असं म्हणतात. कारण डोळे बंद करून तर गाडी चालवता येत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांना बोलताना चिठ्ठी देण्यावरून अजित पवारांनी यावेळी टोलेबाजी केली. मुख्यमंत्री काय बोलतात त्यांचं त्यांना तरी कळतं की नाही कुणाला माहिती. त्यांना मध्येच कुणीतरी चिठ्ठी आणून देतंय. त्यामुळे सांगायचं राहातं बाजूला, ते चिठ्ठीच वाचत राहतात. पहिला मुद्दा राहतो तसाच. पुन्हा इकडून दुसरी चिठ्ठी. मला चिठ्ठी द्यायचं कुणी धाडस तरी करेल का ओ? त्याच्याकडे बघायचो नाय का मी. अरे मुख्यमंत्र्यांनी एखादी नोट घ्या ना. छोटी नोट घ्या. पॉइंट घ्या. त्या पॉइंटवर बोला. तुमचा अपमान तो आमचा अपमान आहे. महाराष्ट्रातल्या १३-१४ कोटी लोकसंख्येचा अपमान आहे. याचं काही तारतम्यच नाहीये, असं अजित पवार म्हणाले.

Exit mobile version