Marathi e-Batmya

काँग्रेसच्या अधिवेशनात सोनिया गांधींनी ‘प्रवासाचा समारोप’ असे सांगत दिले निवृत्तीचे संकेत

छत्तीसगडमधील रायपूर येथे दोन दिवसांपासून काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गांधी कुटुंबियातील कोणीच हजर राहिले नसल्याने विविध चर्चांना उधाण आले. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मनोगत व्यक्त करताना भाजपा आणि आरएसएसवर टीकास्त्र सोडत राजकीय निवृत्तीचे संकेत देत म्हणाल्या, माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे. सोनिया गांधींच्या या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केली.

यावेळी सोनिया गांधी यांनी पुढे बोलताना म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे म्हणाल्या.

Exit mobile version