Marathi e-Batmya

उध्दव ठाकरेंचे म्हणालेः आम्ही धक्काप्रुफ, वादळ निर्माण करणारे सोबत

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वादळ असा उल्लेख करत शिवसेनेने अनेक वादळं अंगावर घेतली. मात्र आता आम्ही धक्काप्रमुफ असून वादळं निर्माण करणारी माणसं आमच्यासोबत आहेत असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमधील ष्णमुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांचं कौतुक करतानाच २०१९ मधील शरद पवारांच्या पावसातील भाषणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केलं.

भुजबळांचा उल्लेख वादळ असा केल्याचा संदर्भ देत, अशी अनेक वादळं शिवसेनेनं अंगावर घेतली आहेत. त्या वेळेस अशी अनेक वादळं सोबत सुद्धा होती, असं शिवसेनेच्या जुन्या दिवसांसंदर्भात विधान केलं. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दलही उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. आताच्या या वादळामध्ये राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ही मंचावरील मोठी मोठी वादळं सोबत आहेतच. इथं शरद पवारसाहेब आहेत. वादळ निर्माण करणारे. हे सोबत असल्यानंतर वादळ असो पाऊस असो ते न डगमगता उभे राहतात, असे सांगत शरद पवारांचे एकप्रकारे कौतुक केले.

तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाविरुद्ध सुरु असणाऱ्या संघर्षाच्या संदर्भातून ते पुढे म्हणाले, त्यामुळे एवढ्या सगळ्यांची सोबत असल्याने मी लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय. भाषणाच्या समारोपाप्रसंगी ते म्हणाले, असो मी जास्त बोलत नाही नाहीतर भुजबळसाहेब म्हणतील कौतुक माझं आहे की तुझं आहे, असं म्हणताच सारेजण हसू लागले. उद्धव यांच्या नावाने घोषणाबाजी झाल्यानंतर ‘आगे बढो’ म्हणतायत तसं पाठीशीही राहा असं सूचक विधान त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

मैदानावरुन झालेल्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट राजकारणावरुन सूचक विधान करताना उद्धव यांनी, “हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या, माझी तयारी आहे. एका मैदानात, व्यासपीठावर येऊ आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे, असंही म्हटलं. उद्धव यांच्या या विधानानंतर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून त्यांचं समर्थन केलं.

दरम्यान, भुजबळ हे जर शिवसेनेत राहिले असते तर तेच शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले असते. मात्र त्यांच्या बाहेर जाण्यामुळे आमच्या कुटुंबात एकच खळबळ माजली. घरातील माणून असा कसा जावू शकतो असे आम्हाला वाटायला लागले. कालांतराने भुजबळ यांच्याबरोबरील कटूता संपली. मात्र त्यावेळी माँ साहेब नव्हत्या अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

Exit mobile version