पुणे: प्रतिनिधी
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता त्यांना अग्नी द्यायचा असतो, मात्र अग्नी देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडले असून त्यांना संरक्षण साधन (पीपीई किट) नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे केली.
स्मशानभूमीत काम करणारा किंवा अग्नी देणारा कर्मचारी हा बहुतांश करून मसनजोगी समाजाचा असतो. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना दफन न करता अग्नी देण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणून या कर्मचार्यांच्या ताब्यात दिला जातो. मात्र केंद्र सरकारच्या गाईडलाईन नुसार डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यांना पीपीई किट दिले जाते. मात्र स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण (पीपीई) किट का दिले जात नाही? असा सवाल त्यांनी केला.
औरंगाबाद येथे स्मशानभूमीत काम करणाऱ्या मसनजोगी समाजाच्या १७ लोकांना कोरोना झाला असून असे अनेक उदाहरण देता येतील. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिले जाते तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट का दिले जात नाही? असा सवाल त्यांनी केला.
स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट द्या
