Marathi e-Batmya

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल ?

मागील अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते यावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. तसेच त्यावेळी शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास स्वामी किंवा दादाजो कोंडदेव नव्हते तर तर दस्तुरखुद्द राजमाता जीजाऊ याच होत्या यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते याबाबत कोणत्याच अभ्यासकाने दावा केला नाही. परंतु आज औरंगाबादेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याच विषयाला छेडल्याने आता त्याचे प्रतिसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबादेत श्री समर्थ साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी रामदास स्वामी नसते तर शिवाजींना कोणी विचारले असते का? असे खळबळजनक वक्तव्य करत देशात गुरू शिष्याची परंपरा मोठी असल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, जय जिजाऊ संघटना आदींकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनाचे इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी अमरावती आणि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळ्यावरुन मोठा वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या एका वक्तव्यावरुनही पुन्हा एकदा वाद उफाळणार असल्याचे दिसून येत आहे.  येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद येथे आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला छोटं नाही म्हणत आहे मी. पण गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं. छत्रपतींनी समर्थांना म्हटलं की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळालंय. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

Exit mobile version