Marathi e-Batmya

राजू शेट्टी यांचा इशारा, किती पोलीस, लाठ्या आणि किती गोळ्या आहेत…

बारसू रिफायनरीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातील शेतकरी तेथे जावून शेतकऱ्यांना वाचवतील. यांच्याकडे किती पोलीस आहेत, किती लाठ्या आहेत आणि किती गोळ्या आहेत ते बघू. सरकारने आता शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी दाखवावी, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी शासनावर टीका केली.

बारसू रिफायनरी प्रकल्पास विरोध करणा-या आंदोलकांवर आज पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलक जखमी झाले. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर शेट्टी यांनी राज्यातील सर्व शेतक-यांनी बारसूला जाऊन तेथील शेतक-यांना न्याय देऊ, असे आवाहन त्यांनी केले. बारसूमध्ये पोलिसांनी केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध करतो, असे ते म्हणाले.

दरम्यान, बारसू सोलगाव रिफायनरी आंदोलनासाठी जाणारे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना आज राजापूर पोलिसांनी अटक केली. याबाबत शेट्टी यांनी पोलिसांच्या दडपशाहीला न घाबरता यापुढेही स्वाभिमानी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहील, असे सांगितले.

Exit mobile version