Marathi e-Batmya

जयकुमार गोरे यांची माहिती, शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियमावली आणणार

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन नियमावली तयार करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. टीईटी संदर्भातील अनेक प्रकरणे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने पदोन्नती आणि त्यानंतरची समायोजन प्रक्रिया विलंबाने होत आहे. यावर्षी संच मान्यता नेहमीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत न होता फेब्रुवारीमध्ये मिळाल्याने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वेळेत होऊ शकले नाही.

जयकुमार गोरे पुढे बोलताना म्हणाले की, सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अतिरिक्त शिक्षक समायोजनाचे अधिकार १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) आहेत. त्यामुळे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकरात लवकर करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

शेवटी बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की, शिक्षक बदलीची विद्यमान प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली आहे. या संदर्भातील शेकडो शासन निर्णयांमुळे प्रक्रिया अनेक टप्प्यांत ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते. या प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता असून, शासन यासाठी सर्वसमावेशक नियमावली तयार करणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांची पदोन्नती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि बदली प्रक्रिया पूर्ण होईल, यासाठी शासन आवश्यक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version