मुंबईः प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून ठाकरे घराण्यात निर्माण झालेला न्यायालयीन वाद आज अखेर मिटला. मालमत्तेच्या हिश्श्यावरून दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हिस्सा मागितला. मात्र जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयातील ही याचिकाच मागे घेतल्याने अखेर ठाकरे बंधुमधील वाद मिटला.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची सुत्रे घेतली. त्याचबरोबर मालमत्ताही ताब्यात घेतली. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे थोरले बंधु जयदेव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेत बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेतील वाटा आपल्याला मिळावा अशी मागणी केली. यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
बाळासाहेबांची एकूण मालमत्ता ही १४.८५ कोटी रूपयांची होती. तसेच अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता होत्या. त्या सर्व मालमत्तांचा उल्लेख मृत्यूपत्रात नसल्याचा आरोप जयदेव ठाकरे यांनी केला होता.
बाळासाहेबांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून अनेक कागदपत्रांवर उध्दव ठाकरे यांनी सह्या घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.
परंतु न्यायालयात या याचिकेवर इन कँमेरा सुणावनी सुरू झाली. साधारणतः दोन वर्षानंतर जयदेव ठाकरे यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका नुकतीच मागे घेतली. त्यामुळे या दोन ठाकरे बंधूंमधील वाद संपुष्टात आला.
ठाकरे घराण्यातील वाद अखेर मिटला
