Marathi e-Batmya

संभाजीराजेंनी व्यक्त केली नाराजी, खाशाबा जाधव यांची गुगलला आठवण तर सरकारला विसर

पुण्यात महाराष्ट्र केसरीची स्पर्धा नुकतीच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांच्या मानधनात वाढ करण्याची मोठी घोषणाही केली. मात्र त्या लगोलग ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती मात्र या जयंतीची आठवण गुगलने लक्षात ठेवली. मात्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला विसर पडल्यावरून माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याशिवाय, अद्यापर्यंत खाशाबा जाधव यांचा कामगिरीचा सरकारकडून उचित सन्मान करण्यात आला नसल्याचे म्हणत नाराजीही व्यक्त केली.

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, गुगलने दखल घेतली पण सरकारने नाही!, १९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे, असा सवालही केला.

देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून “पद्म” पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित असल्याची बाबही त्यांनी यावेळी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

मी खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर “पद्मविभूषण” मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला, मात्र शेवटी उपेक्षाच झाली. आता तरी सरकारने जागे व्हावे. या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना “पद्म” पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असेही संभाजीराजे म्हणाले.

Exit mobile version