Marathi e-Batmya

पोटनिवडणूकीच्या निकालावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुळात हा निकाल…

नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूकीत कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयी झाले. तर चिंचवडमध्ये वंचितने मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने मविआचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत निकालावर भाष्य करत मुळात हा निकाल भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात होता असे सांगत कसब्यातील निकालाचा फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या निकालातून फार काही साध्य होईल, असं नाही. मुळात हा निकाल सरकारच्या विरोधात आहे. सरकारच्या नाकार्तेपणा विरोधात लोकांनी कसब्यात मतदान केले. पिंपरी चिंचवडमध्येही जनमत हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असल्याचं दिसून आल्याचे स्पष्ट केले.

निकालाचे विश्लेषण करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, गेल्या निवडणुकीची आणि आताच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली, तर भाजपाच्या मतांमध्ये फारशी घट झालेली दिसत नाही. फक्त गेल्यावेळी घंगेकरांना तीन-साडेतीन हजार मतं कमी पडली होती. ती त्यांनी या निवडणुकीत भरून काढली. त्यामुळे महाविकास आघाडी पेक्षा कसब्यातील विजय हा धंगेकरांचा विजय आहे, असं मी मानतो, असेही स्पष्ट केले.

कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजय हा रवींद्र धंगेकर यांचा आहे. तो विजय पक्षाचा आहे असे मी मानत नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे जर उभे राहिले नसते तर राहुल कलाटे निवडून आला असता अस का म्हणत नाही? त्यामुळे वंचितच्या भूमिकेमुळे मविआचा उमेदवार पडला या आरोपात काहीही तथ्य नाही, असेही स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

औरंगजेब हे या मातीतले आहेत की नाहीत? तुम्हीच सांगा. ज्याला जाती धर्माचे राजकारण करायचे त्याला करू द्या. लोकच काय ते ठरवतील, असेही औरंगाबाद नामांतर प्रश्नी प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका मांडली.

‘प्रॉब्लम ऑफ रूपी’ या ग्रंथाला १०० वर्षे पूर्ण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘प्रॉब्लम ऑफ रूपी’ या ग्रंथाला ११ मार्च रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित ‘वाढती महागाई आणि रुपयाचं अवमूल्यन’ या विषयावर परिसंवाद घेण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वीच हा प्रश्न या ग्रंथातून मांडला होता. आजही तोच प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आजही त्यावर ठोस उपाययोजना शोधू शकलेली नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Exit mobile version