राज्यातील विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास आता एक महिन्याचा अवधी लागला असून स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेला काल अमित शाह यांच्या उपस्थित सुरुवात झाली. या बैठकीत भाजपाने १५० + जागा लढविण्याबाबत जवळपास एकमत झाले असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मागणी केलेल्या जागांपेक्षा कमी जागा देण्याची तयारी दर्शवित १५०+ जागा भाजपाकडून लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काल आणि आज मुबंईच्या दौऱ्यावर होते. काल रात्री झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी भाजपाच्या नेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अजित पवार गटाकडून ७० ते ८० जागांची मागणी करण्यात आली असल्याचे माहिती देण्यात आली. तर शिंदे गटाकडून विधानसभा निवडणूकीसाठी १०० जागांची मागणी करण्यात आल्याच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र भाजपाकडून १५० हून अधिक जागांवर तयारी केल्याच्या मुद्यांवरही चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह यांनी भाजपा आणि भाजपासोबत असलेल्या जून्या मित्र पक्षांच्या सोबतीने म्हणून १५०+ जागा लढविण्याची तयारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील भाजपाच्या कोअर टीमनेही त्या १५० + जागांवर लक्ष केंद्रीय करून त्या मतदारसंघातील कामांवरच लक्ष्य केंद्रीय केले असल्याचेही यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या प्रवक्ते आणि आमदारांनी राज्यात विद्यमान आमदारांसोबत काही माजी आमदारांच्या मतदारसंघ असे मिळून १०० विधानसभेच्या जागा मागितल्या आहेत. तर अजित पवार गटाकडून ७० ते ८० जागांची मागणी करत इतक्या जागा देण्याची तयारी असेल तर महायुतीत एकत्रित निवडणूका लढवायच्या अन्यथा वेगळा मार्ग लढवायचा असे धोरण स्विकारले आहे. त्यामुळे इतक्या संख्येने जागा द्यायच्या आणि लोकसभेप्रमाणे हातातील जागा गमवायच्या यासाठी भाजपा तयार नाही. लोकसभा निवडणूकीत शिंदे गटाला १६ जागा देण्यात आल्या. मात्र शिंदे गटाच्या ७ जागा निवडून आल्या. तर अजित पवार गटाला ७ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी फक्त १ जागा निवडूण आली. त्यामुळे लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीत हा धोका पत्करायचा नाही असा भाजपाने ठरविल्याचेही यावेळी भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने सांगितले.
भाजपाच्या अन्य एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीतून ४० जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. तर शिंदे गटाला ५० ते ६० जागा देऊ केल्या असून उर्वरित जागांवर भाजपा पुरस्कृत किंवा भाजपा थेट लढविणार असल्याचे सांगत या किमान या जागांवर भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने अर्थात अमित शाह यांनी अंतिम निर्णय घेतल्याचे सांगत हरयाणा राज्यात बसणारा फटका भाजपाला महाराष्ट्रात भरून काढायचा असल्याचे सांगितले.
या सगळ्या भाजपाने ठेवलेल्या प्रस्तावावर शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे प्रत्यक्षात कळू शकले नाही. मात्र इतक्या कमी जागांवर अजित पवार यांचा पक्ष आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष तयार होईल की नाही याबाबत भाजपा नेत्यांना शंका आहे.