Marathi e-Batmya

१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खुषखबर : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल

मुंबई : प्रतिनिधी

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते. आता  खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्य़ांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे सीईटी परीक्षेमध्ये किमान एक गुण आणि बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०% असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Exit mobile version