Marathi e-Batmya

आमदार रईस शेख यांची मागणी, अधिवेशनात सशस्त्र दलाचे अभिनंदन करणारा विशेष ठराव घ्या

भिवंडी (पूर्व) येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून येत्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सशस्त्र दलांनी दिलेल्या जलद आणि निर्णायक प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव मांडण्याची मागणी केली आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे की, २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर आणि भ्याड हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारतातील नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, असे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.

या घटनेमुळे देशभरात संताप आणि दुःख व्यक्त झाले असून आमदार रईस शेख म्हणाले की, समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि राजकीय क्षेत्रातील नेते या क्रूर कृत्याचा स्पष्ट निषेध करण्यासाठी एकत्र आले आहेत.

सपा आमदार रईस शेख पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, ही राष्ट्रीय एकता आणि विवेकाची बाब आहे की महाराष्ट्र विधिमंडळाने एकत्रितपणे शोक, संकल्प, एकता व्यक्त करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरसाठी सशस्त्र दलांचे कौतुक करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. पहलगाम हत्याकांड हा केवळ निष्पाप जीवांवर हल्ला नाही तर आयडिया ऑफ इंडियावरच हल्ला आहे. म्हणून, महाराष्ट्रातील लोक पीडितांच्या आणि राष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा स्पष्ट, मजबूत आणि एकत्रित संदेश आपल्या सभागृहाने देणे अत्यंत आवश्यक आहे, असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

आमदार रईस शेख प्रस्तावित ठरावाबाबत बोलताना म्हणाले की, या ठरावात मृतांच्या कुटुंबांबद्दल आपल्या तीव्र संवेदना व्यक्त केल्या पाहिजेत आणि जखमींना आपण त्यांच्या सोबत असल्याचा पाठिंबा दर्शविला पाहिजे. या ठरावात दहशतवादी हल्ल्याचा भारताच्या सार्वभौमत्वावर आणि मूलभूत लोकशाही मूल्यांवर निंदनीय हल्ला म्हणून तीव्र निषेध केला पाहिजे आणि अशा चिथावणीला तोंड देण्यासाठी सर्व भारतीयांना एकत्र राहण्याचे आवाहन केले पाहिजे, असे सांगितले.

Exit mobile version