Marathi e-Batmya

सुषमा अंधारे म्हणाल्या , राज भाऊ एक पत्र लिहाचं भाजपाला…

भाजपाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीमधून माघार घेतली. त्यामुळे दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, तुम्ही उमेदवार उतरवू नका अशी विनंती केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही असेच आवाहन केलं होते. यानंतर सुरु झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आज दुपारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या निर्णयासाठी त्यांचं कौतुक केलं आहे. मात्र या पत्रामुळे आणि राजकीय दबावामुळे भाजपाने पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याच्या दाव्यावरुन उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टोला लगावला.

सुषमा अंधारे यांनी ट्वीटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमधून या माघार प्रकरणावर भाष्य केले. यावेळी अंधारे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून केली जाणारी वादग्रस्त विधाने आणि वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पांचा संदर्भ देत राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य केले.

भाजपाने राज ठाकरेंच्या पत्राचं कारण पुढे केलं. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपावर होत असेल किंवा भाजपा त्यांचं ऐकत असल्यास माझी विनंती आहे राज ठाकरेंना. राज भाऊ तुम्ही एक पत्र लिहा भाजपाला. ते पत्र असं लिहा की महामहीम राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारीजी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत, असं अंधारे यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

तसेच अन्य एका पत्राचा संदर्भ देताना सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना, महाराष्ट्रातील फॉक्सकॉन वेदांता हा महत्त्वकांशी प्रकल्प जो गुजरातला गेलाय तो परत येण्यासंदर्भातील पत्र लिहा, अशीही विनंती केली.

Exit mobile version