Marathi e-Batmya

भाजपा खासदाराचा इशारा, राज ठाकरेंनी माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश

मागील काही काळात राजकिय क्षितिजावर काहीसे अदृष्य झालेल्या मनसेला पुन्हा पक्षाला सावरण्यासाठी मस्जिदीवरील भोंग्याचा विषय हाती घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न सुरु केला. याबरोबरच अयोध्येत जाणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या अयोध्या दौऱ्याला अद्याप अवकाश असला तरी भाजपाच्या खासदाराने राज ठाकरेंनी माफी मागितली तरच अयोध्येत प्रवेश देणार असल्याचा इशारा दिला.
त्यामुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून चांगलेच राजकारण शिजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपाचे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, २००८ सालापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र मुंबईच्या विकासात ८० टक्के योगदान हे मुळ मुंबईकर नसलेल्या व्यक्तींचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
उत्तर भारतीयांची त्यांनी माफी मागावी अन्यथा मी त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नसल्याचा इशारा दिला.
त्याचबरोबर जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांची भेट घेवू नये अशी विनंती आपण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी भाजपाच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीला टक्कर दिलेली असल्याचे दिसून येत असतानाच आता भाजपानेच त्यांच्या विरोधात संघर्ष पुकारला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमके काय बोलणार आणि भूमिका घेणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह याने दिलेल्या इशाऱ्यावर मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version