Marathi e-Batmya

परवानगी घेवून अक्षयतृतीयेला राज्यभरात महाआरती करणार

जून महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची तयारी सध्या मनसेकडून करण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळात राज ठाकरे यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची पुढील रणनीती आखण्यात येत असून अक्षय तृतीयेला राज्यात सर्व ठिकाणी महाआरती करण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. तसेच यासाठी परवानगी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी मनसेच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.
अयोध्येत गेल्यानंतर नेमका राज ठाकरे यांचा दौरा कसा असेल याच्या नियोजनावलर सध्या सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. त्यासाठी अयोध्या येथे आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो जावून रेकी केली होती. आता पुन्हा एकदा जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय राज ठाकरे यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून राज यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या मागणीप्रश्नी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही पत्र लिहिले आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर अयोध्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा राज यांनी केल्यानंतर राज्यातील अनेक मनसैनिकांनी सोबत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या सर्वांना सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यासाठी किमान १२ रेल्वे गाड्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यादृष्टीकोनातून रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठविण्यात आल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

Exit mobile version