Marathi e-Batmya

मनसेप्रमुख राज ठाकरेंवरील गुन्हे दाखल केल्यानंतर मनसे म्हणाली, संघर्ष…

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबाद येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या मैदानावर आयोजित सभे दरम्यान राज ठाकरे यांनी ३ मे चा अल्टीमेटम दिला. मात्र औरंगाबाद पोलिसांनी सभेसाठी नियम व अटींसह परवानगी देण्यात आली. परंतु घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि आयोजक संजय जेवरीकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनसे नेत संदिप देशपांडे यांनी संघर्षाचा इशारा दिला.

औरंगाबादमधील सभेतील भाषणानंतर पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेचे व्हिडीओ पाहिल्यानतंर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच देशपांडे म्हणाले की, सुरुवातीपासूनच ज्या पद्दतीने सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं सुरु होतं त्यावरुन राज्य सरकारचा राज ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. सभेला इतकेच लोक असले पाहिजेत अशी अट याआधी टाकली होती का? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एकही कलम हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही असा दावाही त्यांनी केला.

राज ठाकरेंना अटक होण्याच्या शक्यतेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, जर अशाप्रकारे सरकार वागत असेल तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल. तुम्ही अन्यायकारकरित्या अडकवणार असाल तर महाराष्ट्र सैनिक संघर्षाला तयार आहे. मग सरकारनेही संघर्षाची तयारी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला.

गुन्हे दाखल होण्याला आम्ही घाबरत नाही. आमच्यावर अनेक केसेस आहेत. १६ वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहेत. उद्या होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घाबरवण्यासाठी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे. पण महाराष्ट्र सैनिक घाबरणारा नाही. १०० टक्के उद्या आंदोलन होणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कारवाई होताना दिसत नाही. कृती आणि बोलण्यात अंतर आहे. एकीकडे अनधिकृत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचा सपाटा लावणार आणि हिंदू मंदिरांवर परवानगी देत नाही ही कृती कोणत्या कायद्याखाली येते. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यात हे सरकार नालायक ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Exit mobile version