Marathi e-Batmya

…आणि मनसे धावली शिवसेनेच्या मदतीला

मुंबई : विशेष प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबई शहराबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हिने असंबध्द वक्तव्य करत प्रसिध्दीचा झोत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नसताना तिने लावलेल्या जाळ्यात अडकायला शिवसेना इतकी निर्बुध्द नसल्याचे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी करत शिवसेनेला राजकियदृष्ट्या एकटे नसल्याचे दाखवून दिले.

राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि मनसेचे विळ्या भोपळ्याचे वैर असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. तरीही मराठी माणूस आणि मुंबईच्या प्रश्नावर मात्र शिवसेनेच्या मदतीला मनसेच नेहमीच धावल्याचे दिसून येत आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यावर शिवसेना प्रवक्त संजय राऊत हे एकटे पडल्याचे चित्र दिसत होते. तसेच त्यांच्याशिवाय शिवसेनेतील कोणताही बडा नेता त्यांच्याबाजूने बोलताना दिसत नव्हता. तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसकडून कंगना रानावत हीच्या वक्तव्यामागे भाजपा कशी आहे याची माहिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु आता शिवसेनेच्या बाजूने मनसेही उतरल्याने आता शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर मुंबईबद्दल बोलणाऱ्या कंगनाला यापूर्वीही मनसेने इशारा दिला होता. त्यानंतर आता तीला पुन्हा एकदा यानिमित्ताने फैलावर घेतल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान कंगनाच्या वक्तव्याचा निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीकडून ठिकठिकाणी निदर्शने करत तिच्या फोटोला चपलांचा मार दिला.

Exit mobile version