मराठी ई-बातम्या टीम
सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतल्यानंतर कोरोनाच्या प्रश्नावर राज्यातील महाविकास आघाडी सरकार फारच संथगतीने काम करत असल्याचा आरोप करत दिलेला निधी खर्चही करत नसल्याची टीका केली. त्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, त्या येणार असल्याबाबत त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. तसेच केंद्राने दिलेला निधी वेगळ्या पध्दतीने खर्च करणार असून त्यासाठी केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे.
राज्यातील करोना रूग्णांची आकडेवारी सांगत सध्या आढळणाऱ्या रूग्णांपैकी ९० टक्के रूग्ण केवळ ४ जिल्ह्यातील आहे. ३ जानेवारीचे आकडे पाहिले तर साडेबारा हजारपेक्षा अधिक करोना रूग्ण आहेत. मुंबईमध्येच ९ हजारच्या दरम्यान रूग्ण आहेत. ४ जिल्ह्यांमध्ये ९० टक्के रूग्ण आहेत. बाकीच्या राज्यात कुठेही इतके रूग्ण नाहीत. त्यामुळे जिथं रूग्ण नाहीत तिथं लॉकडाऊन येण्याचा संबंध येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे मोठं संकट जगावर आलं आहे. फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका सगळीकडे २-३ लाख रूग्णांच्या पुढे आकडे गेलेत. काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत. आपल्याकडे ज्यांना करोना होतो आहे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागत नाही. घरीच ठेऊन नीट औषधपाणी केलं, आराम केला तर बरे होतात. असं असलं तरी प्रत्येकाने काळजी घेणं सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, राज्यात ओमायक्रोन आजाराची संख्या वाढल्याने राज्यात कोणत्याही कार्यक्रमाला गर्दी करू नये. लग्न समारंभ देखील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संपन्न करा. अन्यथा, ओमायक्रॉन आजाराचा धोका वाढल्यास राज्यावर लॉकडाऊन करण्याची देखील वेळ येऊ शकते. यावेळी अजित पवारांनी कार्यक्रमाला गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना यापुढे कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमात मी उपस्थित राहणार नाही, असा सज्जड इशारा दिला. तसेच मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, गर्दी कमी व्हावी यासाठी १ तास आधीच जातो आणि उद्धाटन करतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
केंद्रीय मंत्र्यांच्या आरोपावर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिले “हे” उत्तर
