Marathi e-Batmya

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, दरवर्षी ५००० आयटीआयच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट

राज्य सरकारचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण विभागांतर्गत व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने १७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे आयोजित ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम’ अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अवर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्क्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, चाणक्य मंडल परिवारचे डॉ. भूषण केळकर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शा. औ. प्र. संस्था, संभाजीनगर, शा. औ. प्र. संस्था, अमरावती, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूम, संभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे हा असून, १७ फेब्रुवारीपासून या प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यावेळी ITI ला सहकार्य करणाऱ्या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास व्हिडीओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा संदेश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्वांना वाचून दाखवला.

याप्रसंगी बोलताना मंत्री  मंगलप्रभात लोढा म्हणाले, शिक्षकांच्या शिवाय विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. यासाठी शिक्षकांचे देखील प्रशिक्षण महत्त्वाचे असून, दरवर्षी ५००० ITI प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.” त्याचप्रमाणे पुढे बोलताना मंत्री लोढा म्हणाले कि, जून २०२५ पासून सर्व ITI मध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा आमचा प्रयत्न असून, ITI च्या गुणवत्तावाढीसाठी होत असलेले हे सकारात्मक बदल खाजगीकरण नसून, एकत्रीकरण आहेत.

यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, “सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यामतून होत असलेले जनतेचे कार्य ही ईश्वरी आराधना आहे. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील सकारात्मक बदल घडतील. या विद्यार्थ्यांमधूनच भविष्यातील भारताचे बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स निर्माण करण्याचे काम आपल्या प्रशिक्षकांना करायचे आहे. आपल्याला महाराष्ट्र आणि भारताला AI च्या नकाशावर आणून ठेवायचे आहे.”

Exit mobile version