Marathi e-Batmya

एमपीएससी परिक्षेतील रँकेटप्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळावी म्हणून राज्य सरकारकडून एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेण्यात येते. मात्र या आयोगाच्या परिक्षेत बोगस परिक्षार्थी बसवून त्या बदल्यात पैसे घेण्याचे प्रमाण उघडकीस आल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी उपस्थित करत असे रँकेट चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी आणि स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळत हा विषय चर्चेचा होवू शकत नसल्याची बाब स्पष्ट केली.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार म्हणाले की, एमपीएससी परिक्षेच्या जाहीराती फार कमी असतात. त्यात परिक्षेला बसणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येने असते. त्यामुळे बोगस परिक्षार्थी बसून पैसे कमाविण्याचा धंदा काही जणांनी सुरु केला आहे. बोगस परिक्षार्थींमुळे अनेकांचे नुकसान झाले असून नुकसान झालेले विद्यार्थी आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. त्यांना भेटुन त्याचे प्रश्न सोडवावे.

अध्यक्ष बागडे म्हणाले की, हा मुद्दा पटलावर आला आहे. सरकार त्यांची जबाबदारी पार पाडेल. आपण पुढील कामकाजाला सुरुवात करू.

अध्यक्षांच्या या भूमिकेवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रश्नावर मांडलेला स्थगन स्विकारावा आणि मुलांना न्याय द्यावा अशी मागणी करत याप्रश्नी चर्चा करण्याचे नाकारून सरकार कोणाला पाठीशी घालतेय असा सवालही त्यांनी केला.

त्यावर अध्यक्ष बागडे यांनी याप्रश्नी तुम्ही २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावेळी हा मुद्दा उपस्थित करून त्यावेळी उत्तर मागा अशी सूचना केली. त्यावर विरोधकांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.

 

Exit mobile version