Marathi e-Batmya

शिवाजी महाराजांशी संबधित गड-किल्ल्यासाठी उच्चाधिकार समिती

मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या पर्यटनाबरोबरच महसूली उत्पन्नवाढीसाठी राज्यातील गड-किल्ले लग्न समारंभ, हॉटेल्स, पार्टीकरीता भाडेतत्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयावर राज्यातील सर्वचस्तरातून टीकेची झोड उठल्याने अखेर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित गड-किल्ल्यांना विकसित करण्यासाठी उच्चाधिकारीची स्थापना करत राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या टिपणीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती आली.
पर्यटन व विकासाच्यादृष्टीकोनातून राज्यातील गड-किल्ले विकसीत करण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वर्ग-२ मधील किल्ले हे भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला. परंतु या वर्गवारीतील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबधित होते. मात्र टीकेची झोड उडताच या प्रवर्गातील किल्ले भाडेतत्वावर देण्याचा निर्णय रद्द करत या किल्यांच्या विकासासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेत मंत्रिमंडळाच्या टिपणीत तशी सुधारणा करण्यात आली.
त्याचबरोबर मराठा साम्राज्याशी संबधित असलेले किल्लेही पर्यटन विभागाच्या पूर्वीच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयीची सुधारीत टिपणी राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

Exit mobile version