Marathi e-Batmya

नाणार आंदोलकांचा विधानसभेवर हल्लाबोल

राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्ताविक नाणार रिफायनरी प्रकल्पासाठीची जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करावी या मागणीसाठी नाणार प्रकल्पविरोधी कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घुसून जोरदार घोषणा दिल्या. यामुळे विधानभवनातील सुरक्षा रक्षकांची एकच पळापळ सुरु झाली. एकच जिद्द रिफायनरी रद्द, रिफायनरी हटवा,कोकण वाचवा अशा गगनभेदी घोषणानी विधानभवन दणाणून गेले. यावेळी आंदोलकांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले.

कालपासून चाकरमानी ,शेतकरी, मच्छीमार यांनी कोकण रिफायनरी विरोधी समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु केले आहे. शिष्टमंडळाने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटावे असा निरोप मुख्यमंत्र्यांनी दिला. मात्र आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय इथून हटणार नाही अशी ताठर भूमिका घेतली. सुभाष देसाई यांनी अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. त्यामुळे देसाई यांना भेटून काय फायदा?असा सवाल करीत मुख्यमंत्री जो पर्यंत भेटत नाही तो पर्यंत इथून हटणार नाहीत अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.

पोलिसांकडून आंदोलकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. त्यातील काही आंदोलकांनी विधानभवनातील पास मिळवत विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसले आणि सभागृहाचे कामकाज चालू असताना जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी सुरक्षा यंत्रणेने प्रणाली चव्हाण, निलेश धुमाळ, श्रीकांत कुवरे आणि सोनाली टूकरल यांना सुरक्षा यंत्रणने ताब्यात घेतले.

Exit mobile version