Marathi e-Batmya

वेळ पडल्यास मंत्रीपद सोडेन..

मुंबई: प्रतिनिधी

वेळ पडली तर मंत्रीपद सोडेन. पण, नाणार प्रकल्पाच्या विषयावर आपण कोकणातील माणसाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले.

हुस्नबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना देसाई बोलत होते. या प्रकल्पाला ६७३५ शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. त्यांचा प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही. परिणामी भूसंपादन झाले नाही. हा प्रकल्प लादला जाणार नाही, असेही ते म्हणाले.

केंद्र सरकार, राज्य सरकार, भारत पेट्रोकेमिकल्स, इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोकेमिकल्स यांच्या वतीने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १६ गावांमध्ये हा भव्य प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५४५३.७४५ हेक्टर आर तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३६१.१५७ हेक्टर आर खाजगी जमीन संपादित करावयाची आहे. परंतु, ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता तेथे भूसंपादन होणे कठीण आहे, असेही ते म्हणाले. भाई जगताप, जयंत पाटील यांनी उपप्रश्न विचारले.

Exit mobile version