औरंगाबाद – बालानगरः प्रतिनिधी
या सरकारला कशाची मस्ती आलीय, शेतकऱ्यांची कसली टिंगल टवाळी सुरु आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बालानगर येथील जाहीर सभेत केला.
पुरग्रस्त भागात भाजपचे मंत्री सेल्फी काढणाऱ्या भाजप मंत्र्याचा आणि सरकारचा भोंगळ कारभारावर अजितदादा पवार यांनी जोरदार आसूड ओढला. शिवस्वराज्य यात्रेच्या दुसर्या टप्प्यातील पहिली सभा औरंगाबाद जिल्हयातील बालानगर येथे झाली.
दहा हजार कुटुंबांना कुटुंब संच व एका महिन्याचे रेशन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. या सरकारच्या काही गोष्टी डोक्यातच येत नाही. नुसती बनवाबनवी सुरु आहे. ब्रह्मगव्हाण योजनेला २२२ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. आज त्या योजनेला ५०० कोटींच्यावर काम गेले आहे.कसलं काम करतंय हे सरकार असा खोचक सवालही त्यांनी केला.
आम्हाला फक्त शरद पवार साहेबांनी कर्जमाफी दिली असा लोकांमधून एक आवाज आला, त्यावेळी अरे मी त्यांचाच पुतण्या सांगतोय आमची सत्ता द्या पहिली दिली कर्जमाफी तशी पुन्हा देवू असे आश्वासन देत
या भागातील धरणाचा पाणीसाठा मायनस असल्याची आकडेवारी असून या सरकारला का कळत नाही अशी विचारणाही त्यांनी केली.
आज राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवाला मातीमोलपणा आलाय. किडयामुंग्यासारखे लोक आज मरत आहेत. अनेक कंपन्या बंद पडत आहेत. तरुणांना रोजगार मिळत नाहीय. शिक्षक भरती बंद आहे. आमचं सरकार आल्यावर सर्व रिक्त पदे तात्काळ भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
अनेक योजनांना हे सरकार स्मार्ट सिटी, मेक इन महाराष्ट्र अशी काय इंग्लिश नावं देतंय की ग्रामीण भागात लोकं गपगार होतात. यावेळी निवडणूकीत जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका अनेक गाजरं दाखवायला येतील सावध रहा असे आवाहनही त्यांनी केले.
या सरकारला मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही- मुंडे
आपल्या सुख दु:खात कोण असतं याचा विचार करा आणि या सरकारला मातीत गाडल्याशिवाय गप्प बसायचं नाही असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
राज ठाकरे यांना इडीची नोटीस काढली तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी भाजपाचा पर्दाफाश केला म्हणून त्यांना नोटीस बजावली आहे. तुम्ही जास्त विरोधात बोलता काय घ्या ईडीची नोटीस… अरे हे असले कसले घाणेरडे राजकारण सुरु आहे असा सवालही त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे राज्य असताना राज्यात अनेक विकास कामे झाली आहेत. भाजपाचे नेते चंद्रकात पाटील यांना पुरग्रस्त भागात लोकं विचारणा करतील, जाब विचारतील म्हणून पुरग्रस्त कोल्हापूर येथे १४४ कलम लावल्याची टीकाही त्यांनी केली.
पुन्हा मीच मुख्यमंत्री हेच सांगायला महाजनादेश यात्रा तर दुसरीकडे शिवसेनेचे युवराज जनआशिर्वाद यात्रा काढून मीच मुख्यमंत्री यासाठी परंतु आमची शिवस्वराज्य यात्रा रयतेचं राज्य आणण्यासाठी असल्याचे ते म्हणाले.
आयुष्याचा खेळखंडोबा सुरु आहे; तरुणांनो विचार करा – डॉ. कोल्हे
तुमच्या भविष्यावर वरंवटा फिरवला जातोय तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा कोण तरी करतोय याचा तरुणांनी विचार करावा असे आवाहन डॉ.अमोल कोल्हे यांनी केले.
जन आशिर्वाद घेण्यासाठी युवराज आले तर त्यांना तुमचा आमदार पैठणमध्ये काम करतोय का? हे विचारा… पाच वर्षात तुम्ही कुठे होता हेही विचारा आणि जनतेच्या पाठीशी उभं राहायचं असतं हे त्या जन आशिर्वाद काढणाऱ्या लोकांना सांगा. २२ मंत्र्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली परंतु मुख्यमंत्र्यांनी सिंगल विंडो योजना राबवत क्लीनचीट देण्याचे काम केल्याचा आरोप त्यांनी केला.
पाच वर्षांत पैठण तालुक्यातील एमआयडीसी मध्ये उद्योग धंदे आले का? . किती मुलांना रोजगार मिळाला असा सवाल करत १ लाख ४२ हजार कंपन्या बंद झाल्या आहेत. बेरोजगारांचे तांडे आज महाराष्ट्रात नाक्यानाक्यावर पाहायला मिळत आहे. हे सगळं घडत असताना सत्ताधारी भाजप सेनेचे यात्रा काढतातच कशा असा सवालही त्यांनी केला.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, कबीर मौलाना आदींसह, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारला कशाची मस्ती आलीय… कसली शेतकऱ्यांची टिंगल टवाळी लावलीय
