Marathi e-Batmya

अर्थसंकल्प फुटीची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी करा

मुंबईः प्रतिनिधी

राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.
अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर अध्यक्षांनी व सभापतींनी चौकशी करण्याचे काम केलेले नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.
विधानसभेत मांडलेला अर्थ संकल्प अगोदरच ट्वीटच्या माध्यमातुन बाहेर समजत होता. त्याची जाहिरात जी करण्यात आली ती बाहेर कुणाला तरी सांगून करण्यात आली होती असा आरोपही त्यांनी केला.
सभागृहात मांडलेला अर्थ संकल्प फुटण्याचे हे महाराष्ट्रातील पहिले प्रकरण आहे आणि हा अर्थसंकल्प फोडण्याचे काम अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांनी ट्वीटच्या माध्यमातुन केले आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.
अर्थसंकल्प फुटणे हे साधे प्रकरण नाही. मुख्यमंत्री कितीही समजून सांगत असले तरी ते त्यांनी कधी केले आणि याची माहिती कोणाला दिली या सगळ्याची सर्वकष चौकशी झाली पाहिजे. ट्वीट जे करत होतात तेसुद्धा वेळेच्या आत लोकांपर्यंत पोचत होते. विशेष म्हणजे त्यांचे ट्वीट आमच्याकडे घोषणा होण्याअगोदर पोचत होते. यामध्ये काळंबेरं नक्की आहे का? यामध्ये कुणाचा फायदा करुन देण्याचे काम झाले का? याची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याप्रकरणीची ट्वीटची कागदपत्रे सादर केल्यावर त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version