Marathi e-Batmya

आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ

उस्मानाबाद – वाशीः प्रतिनिधी
‘अ’ गेला तर ‘ब’ आहे आणि ‘ब’ गेला तर ‘क’ आहे आणि कुणीही पक्ष सोडून गेले तरी आमच्याकडे शरद पवार नावाचे विद्यापीठ आहे. त्यामुळे जाणारे खुशाल जावू देत अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत मांडली.
येत्या निवडणुकीत कुणी फंदफितुरी केली तर त्याचा पाडाव करुन निवडणूका जिंकायच्याच आहेत असा आत्मविश्वास व्यक्त करत पाच वर्षात काय केले हे लोकं विचारतील म्हणून आता अनेक घोषणा मुख्यमंत्री करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
छत्रपतींचा भगवा पेलण्याची नीतीमत्ता नसल्यानेच भगवा आम्ही खांद्यावर घेतलाय – खासदार डॉ. अमोल कोल्हे
भगवा पेलण्यासाठी नीतीमत्ता असावी लागते. मात्र तुमची ती नीतीमत्ता नसल्यानेच आम्हाला ‌छत्रपतींचा भगवा हाती घ्यावा लागला आहे. कारण तुम्ही जी फसवणूक केलात ती फसवणूक उघड करण्यासाठीच असल्याचे जाहीर आव्हान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्याची मक्तेदारी घेतलेल्यांना दिला.
महाराष्ट्रातील तरुण, महिला, शेतकऱ्यांनी ठरवलं आहे शिवस्वराज्य आणायचं म्हणूनच राज्यात निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला काळे झेंडे दाखवले जात आहेत हा दोन यात्रेतील फरक लक्षात घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची ताकद तरुणांमध्ये आहे आणि हीच ताकद शिवस्वराज्य आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली. शिवस्वराज्य यात्रेचा आजचा आठवा दिवस असून पहिली सभा उस्मानाबाद जिल्हयातील भूम – परंडा – वाशी विधानसभा मतदारसंघातील वाशी येथे पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार राहुल मोटे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, आमदार सतिश चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, जीवन गोरे आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version