मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात पाच वर्षापूर्वी शिवसेना, भाजपानंतर काँग्रेसमधील नाराज नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकिय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या त्यात शिवसेनेतील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आसरा शोधला. परंतु आगामी विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून आपले राजकिय अस्तित्व राखण्यासाठी राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांच्यापाठोपाठ मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ उटले फिरू लागल्याचे सूचित केले.
तब्बल १० वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिवसेनेची सूत्रे उध्दव ठाकरे यांच्याकडे हस्तांतरीत होताना सेनेतील नाराज भास्कर जाधव, राहुल नार्वेकर, किरण पावस्कर, गणेश नाईक सारखे खंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. तर शिवसेना सोडताना नारायण राणे यांच्यासारख्या राज्यव्यापी नेत्यानेही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी सल्लामसलत केली होती.
मात्र मागील ५ वर्षापासून सत्तेतून बाहेर राहील्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा यापूर्वीच सुरु झाली आहे. परंतु याआधीच राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजपात जावून गर्दी करू लागल्याने आता शिवसेनेचा आसरा राष्ट्रवादीतील नेत्यांनी सुरु केला आहे. सुरुवातीला बीडमधील राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करत मंत्रीपद मिळविले. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सेनेत प्रवेश केला. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेनेतील नाराज नेत्यांनी राष्ट्रवादी जवळ केली अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादीतील नेत्यांनी शिवसेना जवळ करण्यास सुरुवात केल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ आता उलटे फिरू लागल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.
आणि राष्ट्रवादीचे घड्याळ उलटे फिरू लागले
