Marathi e-Batmya

राष्ट्रवादी म्हणते, कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’

कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात हे ईडी सरकार लवकरच ‘रनआउट’ होईल असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

राजकीय लालसेपोटी ईडी सरकारकडून चुकीचे धोरण स्वीकारले जात नाही ना अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या हितासाठी ‘बुलेट ट्रेन’ चा निर्णय तत्परतेने घेतात परंतु महाराष्ट्रातल्या अनेक विषयांवर निर्णय होत नाही असा ट्रॅक रेकॉर्ड ईडी सरकारचा आहे असेही ते म्हणाले.

एकीकडे सरकारच्या संविधानिकतेबाबतचा न्यायालयीन खटला, दुसरीकडे नैराश्यग्रस्त बंडखोर आमदार आणि तिसरीकडे ठाकरे गटाला मिळणारा जनप्रतिसाद आणि त्यावर ‘सी वोटर’ चा लोकसभा निवडणुकीबाबत आलेला सर्वे या सर्व बाबींमुळे ईडी सरकार वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये आहे असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला.

कमी बॉलवर जास्त रन काढण्याच्या नादात असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली आहे त्यामुळे विश्वासघाताच्या आधारावर स्थापन झालेल्या शिंदे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेबांच्या प्रभावाची चिंता भाजपला लागलीय

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसाहेबांच्या प्रभावाची चिंता भाजपाला लागलीय असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी शरद पवारांचा २०२४ ची लोकसभा निवडणूक येता – येता राजकीय प्रभाव कमी होईल असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा महेश तपासे यांनी खरपूस समाचार घेतला.

महाराष्ट्रात ईडी सरकार स्थापन झाले असतानाही केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी पवारसाहेबांवर टिका केली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, पवारसाहेबांचा करिश्मा किती आहे याची धास्ती भाजपाने घेतली आहे असेही महेश ते म्हणाले.

राज्यात सत्ता परिवर्तन ज्यापध्दतीने झाले ते राज्यातील जनतेला मान्य नाही आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला पराभव होणार हे लक्षात आल्यामुळे पवारसाहेबांच्या प्रभावाची चिंता भाजपाला पडलीय असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version