Marathi e-Batmya

चिखलातून… मोटारसायकलवरुन प्रवास करत पाझर तलावाची पाटलांनी केली पाहणी

चाळीसगांव : प्रतिनिधी

फुटलेल्या पाझर तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नसताना चक्क कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरुन तीन किलोमीटरचा प्रवास करत आणि चिखल तुडवत अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्यातील जळगाव, औरंगाबाद इथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत आहेत. आज सकाळी चाळीसगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

तीन दिवसापूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने बिलदरी पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटला होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज या तलावाची पाहणी केली. यावेळी अधिकारी वर्गही उपस्थित होता. पहिल्यांदा या तलावाची दुरुस्ती करू असं आश्वासन त्यांनी यावेळी जनतेला दिले.

बिलदरी पाझर तलाव फुटल्याने जमिनीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ती पाणथळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.

आजूबाजूचा परिसर या पाझर तलावातील पाण्यावर शेती आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी अवलंबून होता. स्थानिकांची पाण्याविना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाईल असे ठाम आश्वासनही त्यांनी स्थानिक नागरिकांना दिले.

Exit mobile version