Marathi e-Batmya

परराज्यातील मुद्यावरून आपल्या राज्यातील शांतता बिघडवू नका

मराठी ई-बातम्या टीम

शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यास बंदी घालण्याच्या निर्णयावरून कर्नाटकात हिजाब विरूध्द भगवे उपरणे असा संघर्ष निर्माण झाल्याने तेथीव वातावरण क्षुब्ध बनले आहे. तसेच याप्रश्नी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून याप्रश्नावर सोमवारी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. परंतु तेथील घडत असलेल्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कठोर शब्दात ताकिद देत राज्यातील शांतता बिघडवू नका असे आवाहन केले.

जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी सामान्य नागरिकांसोबतच या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना देखील तंबी देत म्हणाले की, जे मी सामान्य नागरिकांना सांगितले तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचे काम वाढवू नये अशी ताकीदही त्यांनी राजकिय पक्षांना दिली.

माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारे किंवा रोष वाढवणारे वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये असे आवाहनही त्यांनी धर्मगुरूंना केले.

दरम्यान, कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये उमटले असून हिजाबच्या विरोधात आंदोलनही करण्यात आले. तर काही ठिकाणी समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. त्या दोन-चार जिल्हे वगळता राज्यात इतरत्र मात्र याप्रश्नावर अद्याप कोणीही आंदोलन केले नाही. परंतु आंदोलनाची शक्यता गृहीत धरून मुस्लिम बहुल जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवत गृहमंत्री वळसे-पाटील यांनी केले.

Exit mobile version