मुंबईः प्रतिनिधी
केंद्रातील व राज्यातील भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहे. संविधानिक संस्थांची गळचेपी सुरु असून देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी शनिवारी ९ मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांच्या नेतृत्वाखाली टिळक भवन दादर येथून तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी सेवादलाचे कार्यकर्ते कामाला लागले असून शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. टिळक भवन दादर येथे लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाची कोकण विभागाची बैठक सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीला सेवादलाचे महाराष्ट्र प्रभारी मंगलसिंग सोळंकी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर दुपारी १ वा. सेवादलाचे कार्यकर्ते टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर पश्चिम येथून तिरंगा पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा पुढे म्हात्रे पेन इंडस्ट्रीज शारदाश्रम दादर पोलीस स्टेशन मार्गे टिळक भवन येथे पोहोचेल व यात्रेचा समारोप होईल. लोकशाही रक्षणाच्या या लढ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सरचिटणीस संजय तायडे पाटील, शेखर पाटील, रतन तिवारी, राहुल खटके, व्ही. एस. राजगोपालन, मोनिका पाटील यांनी केले.
हुकुमशाही सरकारविरोधात काँग्रेस सेवादलाची तिंरगा पदयात्रा
