मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील जनतेला कमीत कमी दरात वीज उपलब्ध व्हावी या अनुषंगाने वीजदरा संदर्भात एमईआरसीकडे प्रस्ताव आला आहे. या वीज दरासाठी जनसुनावण्या घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी देत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेला देखील आपले म्हणणे मांडता येणार असून त्यानंतर एमईआरसीने घेतलेला निर्णय शासनाकडे येईल आणि त्यावर शासन योग्य तो पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य जनतेला कमीत कमी दरात वीज मिळावी या प्रमुख मागणी करीता महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री राऊत यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी वरील आश्वासन दिले.
सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
संघटनेच्यावतीने शेतीपंप, वीज बीले, वीज दर व कृषी संजीवनी योजना तसेच औद्योगिक वीज ग्राहकांचे वीज दर, स्पर्धात्मक पातळीवर आणणेबाबत उपाययोजना करणे, नवीन वीज दर वाढ प्रस्तावास स्थगिती देणेबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी कोल्हापूरचे आ. चंद्रकांत जाधव, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे व इतर पदाधिकारी तसेच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक महावितरण असिमकुमार गुप्ता व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा प्रश्नी पुनर्निरिक्षण करा
मोर मध्यम प्रकल्पातील सौरऊर्जा संदर्भात महावितरणने शासकीय जागेच्याबाबत पुनर्निरिक्षण करुन अहवाल द्यावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.
मोर मध्यम सौरऊर्जा प्रकल्प शासकीय जमिनीवर उभारण्यात यावा ही बाब महावितरणच्या विचाराधीन होती. तथापि त्या ठिकाणी निकषात बसणारी जागा नसल्याने हा प्रकल्प आतापर्यंत होऊ शकला नाही. त्या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी व महावितरणने जागेचे पुनर्निरिक्षण करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले.
वीज ग्राहकांना कमी दरात वीज देण्यासाठी जनसुनावण्या घेणार
