Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, त्यांना केवळ बहुजनांची मते हवीत

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत आधी राज्यघटनेची पायमल्ली केली आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए १ आणि २ जेव्हा संविधानात सुधारणा करत होते, तेव्हा यांनी त्यावर मौन बाळगले होते आणि मवाळ हिंदुत्वाचे पांघरुन घेतले होते. या पक्षांना बहुजनांच्या मतांचा वापर करून आपला वाडा वाचवायचा होता आणि तो नव्याने बांधायचा होता आणि ते त्यांनी केले असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे ट्विट मध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, या निवडणूक प्रक्रियेत, बहुजनांनी स्वत:चे स्वतंत्र राजकीय नेतृत्व उभे करण्याची आणि त्यांना संसदेत पाठवण्याची संधी गमावली आहे. आमचा लढा नेहमीच संविधान वाचविण्यासाठी राहिला आहे. किंबहुना हेच आमचे तत्वज्ञान आणि विचारधारा असल्याचे स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, बहुजन मतदारांना हे किती वेळा मूर्ख बनवणार? खरंच यांनी बहुजन मतदारांना मूर्ख बनवून धोका दिला नाही का? अशा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे आपल्या ट्विट मध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर या पक्षांना संविधान वाचवायचे असते, सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचे असते, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती. तसेच, बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापनाच केली नसती, असे सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या ताकदीचा स्त्रोत जय फुले, जय सावित्री, जय शाहू, जय भीम आहे. वंचितांच्या न्याय हक्काचा आणि संविधान रक्षणाचा आमचा लढा सुरूच राहणार आहे. आगामी काळात आम्ही मोठ्या ताकदीने आणि विश्वासाने जनतेच्या पाठिंब्यावर भरारी घेऊ, पुनरागमन करू, असा विश्वासही यावेळी ट्विटमधून व्यक्त केला.

Exit mobile version