Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित शिवाय कुणीही आरक्षणावर भूमिका घ्यायला तयार नाही

वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय भूमिका घ्यायला तयार नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील रांजणी येथील सभेला संबोधित करताना व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत. राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्या की लोकांसमोर उलगडा व्हायला सुरुवात होईल. १९८० साली देशाचे अर्थमंत्री डॉ. जिचकर होते. त्यावेळी भारताची लोकसंख्या जवळपास १०० कोटींच्या आसपास होती. महाराष्ट्राची लोकसंख्या ७ ते ७.५ कोटी एवढी होती. त्यावेळी शासकीय नोकरदारांची संख्या २२ लाख होती. आता राज्याची लोकसंख्या १२ ते १३ कोटी एवढी आहे. मात्र, शासकीय नोकरदारांची संख्या २२ लाखांवरुन १४ लाख झाली असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आज कोणताही राजकीय पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका मांडायला तयार नाही. याचे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना वाटत आहे की, आपण यावर भूमिका घेतली तर मराठा समाज आपल्यापासून दूर होईल असा दावाही यावेळी केला.

आरक्षण बचाव यात्रेचा आज तिसरा दिवस आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, रांजणी, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा आणि मुक्कामी सोलापूर येथे यात्रा थांबणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे, नेते इम्तियाज नदाफ, अविनाश भोसीकर आणि ओबीसी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version