मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र विद्यमान सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यावरून स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाला प्रशासकीय यंत्रणांना सामोरे जावे लागले. त्यातच बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतरही शाळेच्या यंत्रणेने आणि पोलिस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कोलकाता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्यानंतर या घटनेवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पहिल्यादाच भाष्य करत बस्स आता बस्स अशी खंत व्यक्त केली.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, कोलकाता येथील घटना वेदनादायक आणि भयावह आहे. बस आता खूप झालं, ज्यावेळी कोलकाता येथे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत होते तेव्हा या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत होते असा आरोप केला.
पुढे बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, कोणताही सुसंस्कृत समाज मुलींवर अशा प्रकारे अत्याचार होऊ देऊ शकत नाही. समाजाला आता प्रामाणिकपणे आत्मपरिक्षण करण्याची गरज असून समाजाची दयनीय मानसिकता महिलांना कमी लेखते. १२ वर्षापूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर अशा बऱ्याच घटना घडल्या. मात्र समाजाने त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या समाजाला स्मृतीभ्रंशाचा त्रास झाल्याचे दिसून येत असून या संकटाचा सामना सर्वांनी मिळून केला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.
Women’s Safety: Enough is Enough — writes President Droupadi Murmu on the recent spate of crimes against women.https://t.co/p8lVaqGd1K
— President of India (@rashtrapatibhvn) August 28, 2024