Marathi e-Batmya

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दिनांक २२ जून, २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन  प्रवेशासाठी प्रथमच एकही  प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून  पीठासीन अधिकारी, माननीय मुख्यमंत्री ते अधिकारी-कर्मचारी वर्ग, स्वीय सहायक, अभ्यागत अशा सर्वांसाठी विधान भवन ई-प्रवेश प्रणालीद्वारे “चेहरा पडताळणी पध्दती” (Face Recognition System) अवलंबिण्यात येत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे देण्यात आली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभेचे माननीय अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अत्यंत काटेकोर स्वरूपात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अधिवेशनकाळात विधान भवन परिसरामध्ये होणारी गर्दी नियंत्रित असावी तसेच सुरक्षा यंत्रणेला तपासणी संदर्भात सुलभता असावी या दृष्टीने या पावसाळी अधिवेशनात छापील प्रवेशपत्राऐवजी “चेहरा पडताळणी पध्दती” (Face Recognition System) राबविण्यात येत असून याबाबत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच अन्य सर्व संबंधित आस्थापना, वार्तांकनासाठी येणारे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, भा.प्र.से. तसेच भा.पो.से. आणि अन्य सर्व अधिकारी कर्मचारी, सचिव-विशेष कार्य अधिकारी, सर्व स्वीय सहायक अशा सर्वांना यासंदर्भात विधानमंडळ सचिवालयातर्फे सूचित करण्यात आले आहे. ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन स्वरूपात माहिती पाठविणे, आवश्यक ती माहिती ई-मेलवर प्राप्त करून घेण्याची कार्यवाही सुरू झाली असून ती दिनांक २० व २१ जून, २०२६ रोजी सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने जारी केले आहे. सर्वांनी या नव्या प्रवेशपास प्रणालीचा स्वीकार करावा आणि सुरक्षा यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही विधानमंडळ सचिवालयातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version