Marathi e-Batmya

मंत्रालयात असून ऐनवेळी दांडी मारणाऱ्या अजित पवार यांच्याकडे अखेर पुणे

भाजपाच्या पुन्हा एकदा मोदी सरकारसाठी राज्यातील राष्ट्रवादी पक्षात फुट पाडत अजित पवार यांना शिंदे-फडणवीस सरकारने उपमुख्यमंत्री पद दिले. त्यानंतर अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे कामाचा सपाटा सुरुही करत सकाळी ९.३० वाजता किंवा त्यापूर्वी सकाळी मंत्रालयात येऊन कामे उरकण्यास सुरु केली. मात्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सकाळी मंत्रालयात हजर राहिले. मात्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्याने अखेर शिंदे-फडणवीस सरकारने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडून काढून घेत अजित पवार यांच्याकडे आज अधिकृतरित्या सोपविले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचा दावा एकाबाजूला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी जाहिर केले. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांच्या बाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी काहीजणांनी फक्त वेगळी भूमिका घेतल्याचे सांगत शरद पवार यांच्याच सांगण्यावरून अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपासोबत गेले की, त्यांना खरोखरच भाजपासोबत जाऊन फक्त सत्ता हवी होती हे मात्र दोन्ही गटाकडून गुलदस्त्याच ठेवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरीच फुट आहे की नाही यासंदर्भात राज्याच्या राजकारणात संभ्रमावस्था आहे.

त्यातच पुणे जिल्हा पूर्णपणे विकसित करण्यात आणि तेथील जमिनीचे दर वाढविण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या कौशल्यपूर्ण नीतीचा मोठा वाटा आहे. त्यातच मागील दोन निवडणूकांमध्ये तेथील जनतेने भाजपाला चांगली साथ दिली आहे. तसेच पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवड, बारामती लोकसभा मतदारसंघात आणि दौंड, इंदापूर, पुरंदर, मावळ आदी परिसरातही राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगल्यापैकी प्रभाव आहे. मात्र या सर्व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सध्या भाजपाकडून आव्हान देण्याचे काम सुरु. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हाती राहिले तर पवार कुटुंबियांची सत्ता आबादीत राहणे शक्य होणार आहे. त्यामुळेच भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्री पद काढून अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच अजित पवार समर्थक आमदारांना त्यांच्याच जिल्ह्याचे पालकमंत्री मिळाल्याचे २०२४ च्या निवडणूकीला सामोरे जाण्यात अजित पवार गटाला सोपे जाणार आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यातून अजित पवार समर्थक आमदार निवडूण आले त्यांच्याकडेच जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आल्याचे उपलब्ध यादीवरून दिसून येत आहे.

काल अजित पवार मंत्रालयात होते का?

मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनुसार काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी अजित पवार हे सकाळी ९.३० वाजता सकाळी मंत्रालयात आले. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आवश्यक असणाऱ्या काही फायलींवर त्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्या सर्व स्वाक्षऱ्या अजित पवार यांनी त्यांच्या दालनात बसून केल्या. तर मंत्रिमंडळ बैठकीची वेळ होती दुपारी १२ वाजताची. बरोबर १२.३० वाजता अजित पवार हे त्यांच्या दालनातून लिफ्टमार्गे बाहेर पडले.

 

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत पाटील

अमरावती- चंद्रकांत पाटील

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Exit mobile version