मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सुमारे १ कोटी २३ लाख रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब १ किलो साखर २० रूपये प्रति किलो दराने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी राज्यात ३९ कोटी रूपये किंमतीची १ लाख २२ हजार ९४७ क्विंटल साखर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिली.
याशिवाय रेशन दुकानामध्ये नोव्हेंबर २०१८ पासून अंत्योदय अन्न योजना व रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारकडून अनुदानित दराने प्राप्त होणाऱ्या चणा डाळ, उडीद दाळ वाटप सुरु करण्यात येणार आहे. राज्यातील २५ लाख अंत्योदय शिधापत्रिका आणि १ कोटी २३ लाख रेशन कार्डधारक असे मिळून ७ कोटी १६ हजार लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक कार्डधारकांना २ किलो डाळी त्यामध्ये उडीद प्रति किलो ४४ रूपये व चणा डाळ प्रति ३५ रूपये दराने मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळी सणासुदीच्या दिवसात विविध पदार्थ वापरण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता गृहीत धरून अशा भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
या भेसळयुक्त पदार्थांमुळे दिवाळीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, खवा, मावा यांची आवक बाहेरच्या राज्यातून ट्रँव्हल्स आणि रेल्वेच्या माध्यमातून करताना आढळून येते. या सर्व बाबींवर लक्ष ठेवून कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात दिवाळी व इतर सणानिमित्त भेसळयुक्त बर्फी, खवा, मावा, तेल, तुप या अन्न पदार्थांवर धाड टाकून ते जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत ३५ लाख किंमतीचे २१ हजार २२५ किलो भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तसेच दिड कोटी रूपये किंमतीचे १ लाख ५५ हजार ६५२ किलो वनस्पती तुप आणि खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर ३७ लाख ७७ हजार रूपये किंमतीची ४६ हजार ९७६ भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीसाठी रेशन दुकानावर साखर २० रूपये प्रति किलो दराने मिळणार
