शिवसेनेतील पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी आपण लवकरच उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार आज एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत म्हणाले, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट उध्दव ठाकरे यांनी आखल्याचा आरोप करत शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपविण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट केला.
त्यानंतर रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले, शरद पवारांच्या मांडीवर बसून पक्ष चालविणाऱ्यांना पक्षप्रमुख का म्हणायचे ? असा सवाल करत पालापाचोळा कोणाचा झाला आहे याचं आत्मपरिक्षण त्यांनी करावं असा खोचक सल्लाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना दिला.
उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे असा मला संशय आहे. नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो, मराठा नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? असा प्रश्न मला पडला असल्याचेही ते म्हणाले.
उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात. तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला नाही तर कोकणातील शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदमला पाडून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना? अशी खोचक विचारणाही त्यांनी यावेळी केली.
मी त्यांना पक्षप्रमुख म्हणणार नाही, माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. शरद पवारांऐवजी बाळासाहेबांच्या विचारांचा नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटलं असतं. पण आज ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून, त्यांच्या विचारांशी सहमन होऊन काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी, बेईमानी, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
आमदार, खासदार, नगरसेवक का जातात याचं आत्मपरीक्षण करा. शिवसैनिकांना भावनात्मक पध्दतीने ब्लॅकमेल करायचं काम सुरु आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती अशी टीका करत ते पुढे म्हणाले, तुम्ही आजारी होतात, पण आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? आदित्य ठाकरेंना आपलं सोडून इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या यात्रा निघत आहेत, मातोश्री व शिवसेनेचे दरवाजे उघडले असून सर्वांना भेटत आहात. हेच जर तीन वर्ष केलं असतं तर ही वेळ आली नसती असा टोलाही त्यांनी यावेऴी लगावला.
लाखात पाहिली तर उंदराला मांजर साक्ष अशीच होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती, तर मग त्यांच्या विचारांसोबत गद्दारी कोणी केली ते देखील सांगा. नवीन शिवसैनिक तुमच्या भावनात्मक गोष्टींमध्ये अडकतील, पण जुन्या शिवसैनिकांनी अनुभव घेतला आहे. अनेक शिवसैनिक वारले, देशोधडीला लागले, संसार उद्ध्वस्त झाले, त्यानंतर ही शिवसेना उभी राहिली. तुमच्या आदित्यचं योगदान काय? ते आमदार, खासदारांना पाहतदेखील नाहीत. मी प्लास्टिक बंदी केली आणि आपणच केली असं ते सभागृहात सांगत होते असा आरोपही त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला.
संजय राऊत नेमके कुणाचे आहेत? ते शिवसेना एकत्र ठेवू शकतील का? पण यातून उद्धव ठाकरेंना त्यातून बाहेर पडायचं नाही. आता ५० लाख स्टॅम्प पेपर जमवा. सगळ्यांकडून मी पाठीशी उभा आहे लिहून घ्या, असा टोलाही त्यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.
रामदास कदम यांचा आरोप, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट
