Marathi e-Batmya

अखेर महिला आयोगाने आव्हाडप्रकरणी मागवला अहवाल

भाजपाच्या महिला कार्यकर्त्या रिदा रशीद यांनी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. त्यानंतर भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. तसेच तक्रारदार महिला रिदा रशीद यांनी मग आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि खासदार सुप्रिया सुळे आता गप्प का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आज रूपाली चाकणकर यांनी आज मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी महिला आयोगाच्यावतीने पोलिसांना पत्र लिहीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

महिला आयोगाच्यावतीने ठाणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र लिहीत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्याबाजूने सदर महिलेने आव्हाड यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या महिलेवरच कायदेशीर कारवाई करावी आणि आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करावा अशी मागणी करणारे पत्र महिला आयोगाला मिळाले आहे.

यापार्श्वभूमीवर मूळ फिर्यादी आणि तीच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजूची सत्यता तपासून पाहण्यासाठी राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावे असे निर्देश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले.

त्यामुळे आव्हाडप्रकरणी पोलिसांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महिला आयोगास सादर झाल्यानंतर रिदा रशीद यांच्यासोबत घडलेली हकिकत समजावी याकरीता पोलिसांनी वस्तुस्थिती दर्शक अहवाल पाठवावा अशी मागणी केली. 

Exit mobile version