Marathi e-Batmya

मनूचा जयजयकार करण्याची भिडेची हिम्मत कशी होते ?

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जनतेचे श्रध्स्थान असलेल्या ज्ञानोबा-तुकोबा माऊलीच्या वारीत संभाजी भिडे यांने किर्तन करताना या दोन्ही संत पुरूषांचा अपमान करत मनु एक पाऊल पुढे असल्याचे जाहीरपणे सांगितले. हा महाराष्ट्र संत, फुले-शाहू आणि डॉ.आंबेडकरांच्या विचारावर चालणारा असताना अशी संविधान विरोधी भूमिका कशी काय मांडली जावू शकते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत याप्रकरणी राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी मागणी केली.

राज्यात सामाजित सलोखा राखण्यासाठी महापुरूषांनी मोठ्याप्रमाणावर काम करत असताना मनुच्या विचारांना विरोध केला. प्रसंगी त्याची पुस्तके जाळली. तरीही संभाजी भिडे सारखी माणसे संत महात्मे, महापुरुषांचे विचार खोटे ठरवित मनुचा पुरस्कार करत असल्याने त्यांच्यावरील कारवाई करणार का असा सवालही त्यांनी यावेळी केला.

एक व्यक्ती तलवारी घेवून फिरते. त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. भिमा कोरेगांव प्रकरणी संशयीत असताना त्याला अटक केली जात नाही. सरकार पाठीशी घालत आहे. तरीही ही व्यक्ती ज्ञानोबा-तुकाराम माऊलीचा अपमान करून मनु एक पाऊल पुढे आहे असे सांगून लोकांना दिशाभूल करत आहे. यामुळे लोकांमध्ये संताप असून त्यांच्याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी आणि पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकार घटनेवर आधारीत असे चालत असून मनुच्या विचारांचा प्रसार करण्याचे किंवा त्याचे समर्थन केले जात नाही. संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानने काढलेल्या शस्त्रास्त्र मोर्चामुळे कोठेही खरी शस्त्रास्त्र वापरू नये डमी वापरावी असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मनुवादी विचाराचा पुरस्कार आणि समर्थन कधीही करणार नसून जे बोलले आहे. ते तपासून संविधान विरोधी असेल तर त्याविरोधात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.

Exit mobile version