Marathi e-Batmya

बदलीच्या दिवशीच ‘धडाधड’ बदल्या, पोलीस अधीक्षकांकडून नियमबाह्य बदल्यांचा गंभीर आरोप

सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे तडकाफडकी बदली होताच त्यांनी अखेरच्या दिवशीच ‘पॉवर प्ले’ करत त्यांनी आपल्या अधिकारात जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेपासूनच तुषार दोषी यांची कारकीर्द वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे. या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले होते, तर राज्यभर यावर चर्चा रंगली होती. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की राज्य सरकारला त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे लागले होते.

त्यानंतर शासनाने त्यांची साताऱ्यातून सांगली येथे बदली केली; मात्र बदलीच्या दिवशीच त्यांनी अधिकाराचा कथित गैरवापर करत अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमानुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याला अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार नसताना हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड प्रक्रियेपासून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले होते, तसेच राज्यभर चर्चाही झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांना काही काळ सक्तीच्या रजेवर पाठविले होते. यानंतर शासनाने त्यांची सातारा येथून सांगली येथे बदली केली. मात्र बदली झाल्यानंतरही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे समोर आले आहे.

नियमांनुसार बदली झालेल्या अधिकाऱ्याला त्या दिवशी अशा प्रकारचे प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सातारा शिवसेनेने राज्याचे पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच राज्याचे पर्यटन मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे.

“हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी,” अशी ठाम भूमिका सातारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी मांडली आहे.

Exit mobile version