Marathi e-Batmya

उध्दव ठाकरे म्हणाले, रात्रीस चालेचा नवा खेळ सुरू झालाय

मुंबईः विशेष प्रतिनिधी
मध्यरात्रीपासून घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने पवारसाहेबांनी चित्र स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात हा खेळ सुरु आहे, तो लाजिरवाणा आहे. नवं हिंदुत्व दाखवलं जात आहे. ते हिंदुत्व नाही. ईव्हीएमचा खेळखंडोबा पुरला नाही म्हणून हा रात्रीस खेळ चालेचा खेळ सुरू केल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भल्या पहाटे स्थापन झालेल्या भाजपा सरकारवर टीका केली.
मी पुन्हा येईन ऐवजी मी जाणारच नाही हेच त्यांना दाखवायचे आहे. त्यामुळे त्यांनी जाण्याऐवजी खुर्चीला फेव्हीकॉल लावूनच मी जाणार नाही असे म्हणा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
यांचा रात्रीस खेळ चाले आहे, आमचं जे काही आहे ते उघड उघड आहे आणि करतो. हरियाणात, बिहारमध्ये जे झाले, तो जनादेशाचा आदर आहे का असा सवाल भाजपाचे नाव न घेता करत मी आणि मीच या मी पणा विरोधात लढाई सुरु झाली आहे. कुणी पाठीत वार करु नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पवारसाहेब म्हणाले त्याप्रमाणे एकत्र आलो आहोत. एक आहोत आणि राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पार पडली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक,आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार सुप्रियाताई सुळे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अनिल देसाई, उपस्थित होते.

Exit mobile version