Marathi e-Batmya

पवारांच्या टोल्यानंतर राज्यपाल भवनाकडून स्पष्टीकरण

मुंबईः प्रतिनिधी
डाव्या संघटनांच्या नेतृत्वाखाली कामगार-शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांना अभिनेत्री कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नसल्याचा टोला लगाविल्यानंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत तात्काळ खुलासा करत आपण गोवा विधानसभेच्या पहिल्या सत्राला संबोधित करण्यास जाणार असल्याची माहिती यापूर्वीच मोर्चेकऱ्यांना दिल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये स्पष्ट केले.
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात येणार असून त्यासंदर्भातील निवेदन देण्याबाबत राज्यपालांकडे संघटनांनी वेळ मागितली होती. मात्र २५ जानेवारी रोजी आपण गोवा विधानसभेच्या पहिल्या सत्रासाठी जाणार असल्याने त्या दिवशी आपण मुंबईत राहणार नसल्याची माहिती देण्यात आली होती. मोर्चेकरी संघटनांच्या प्रतिनिधींकडून राजभवनाकडून तशी खातरजमाही करण्यात आल्याचा माहिती प्रसिध्दी पत्रकातून देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आरोपातील हवा निघून गेली आहे.
राजभवनाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकात सीपीआयएमच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत अवगत करण्यात आल्याची बाब त्यांच्या नावानिशी केली.
दरम्यान, सभेनंतर निवेदन देण्यासाठी निघालेल्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी मेट्रो सिनेमागृहा समोरील चौकात अडविल्यानंतर कॉ.अशोक ढवळे यांनी राज्यपालांना सांगूनही राज्यपाल थांबले नसल्याने तुम्हाला आमच्यासाठी वेळ नाही तर आम्हीही तुम्हाला निवेदन देणार नसल्याचे जाहीर करत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन आम्ही थेट राष्ट्रपतींना पाठवू असे सांगत राज्यपालांना द्यावयाच्या निवेदनाच्या प्रती मोर्चेकऱ्यांनी फाडून टाकल्या.

Exit mobile version