Marathi e-Batmya

“त्या” फोटाेवरून ट्रोल झालेल्या संजय राऊतांनी दिले “हे” उत्तर

मराठी ई-बातम्या टीम

काही दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवारांना खुर्ची देतानाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यावरून माझ्यावर टीका फार टीका करण्यात आल्या. पण त्यांना बसण्यासाठी मी खुर्ची का दिली हे समजून घ्यायचे असेल त्यांनी ते पुस्तक वाचले पाहिजे. जे अत्यंत विकृतपणे त्या प्रसंगावर टीका करत होते त्यांनी हा ग्रंथ वाचल्यावर कळेल माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराने शरद पवारांना खुर्ची का दिली. त्यांचा तो मान आहे. पण आपल्या देशामध्ये जे विकृत राजकारण सुरु असल्याचे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी सांगत त्या फोटोवरून झालेल्या टीकेला उत्तर दिले.

विकृत राजकारणावर सुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणावर आधारीत नेमकचि बोलणे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत पार पडला. अर्थशास्त्रज्ञ, पत्रकार सुधीर भोंगळे यांनी पवारांच्या भाषणांचा संग्रह असलेलं ‘नेमकचि बोलणें’ या पुस्तकाचं लेखन केले आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. शिवसेना खासदार संजय राऊतही यावेळी उपस्थित होते.

महाविकास आघाडीचा जो आपण ग्रंथ निर्माण केला आहे त्याला भगवे कव्हर आपण घातले आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. हे सरकार अवघा रंग एकची झाला असे आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करत नेमकचि बोलणे हे पुस्तक आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवायला हवे. कारण महाराष्ट्र हा सतत देशाला काही विचार देत असतो. शरद पवार यांच्या ६१ भाषणाच्या या पुस्तकाची प्रत आपण पंतप्रधानांना देऊ. नेमकचि बोलणें याची फोड करुन त्यांना सांगू असा उपरोधिक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.

Exit mobile version